Manikrao Kokate शेतकऱ्यांना जबाबदार धरण्यावरून संतापाची लाट
सध्या कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरलेले असताना, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच यासाठी जबाबदार धरल्याने संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारकडे जाब विचारण्याऐवजी शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपदेश देणं आणि त्यांची खिल्ली उडवणं हे अत्यंत खेदजनक असल्याचं मत विविध नेत्यांनी मांडलं आहे.
“शेतकऱ्यांनीच कांद्याचा भाव पाडला” – कोकाटेंचं वादग्रस्त विधान
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात असं वक्तव्य केलं की, “एखाद्या शेतकऱ्याला दोन-पाच हजार रुपये भाव मिळाल्यावर बाकीचे सर्वजण कांदा लावतात, त्यामुळेच भाव पडतो.” या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा, कर्जमाफी याबाबत मागणी केली की, ‘साखरपुडे करा, लग्न करा’ असे टोमणे त्यांनी मारले.
मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी जोरात
या वादग्रस्त वक्तव्यानंतर कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. “शेतकऱ्याच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्याला राज्याच्या मंत्रिमंडळात ठेवणं म्हणजे बळीराजाचा अपमान,” असा संतप्त सूर उमटत आहे.
अजित पवार यांनी दिली शेवटची संधी
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, ही शेवटची संधी आहे. यानंतर अशा बेताल वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास त्यांचं मंत्रीपद धोक्यात येऊ शकतं.
माणिकराव कोकाटे आधीच वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकलेले
कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जवाटपात १८२ कोटींच्या गैरव्यवहारासंदर्भात आरोप आहेत. शिवाय दोन सदनिकांच्या प्रकरणात त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे आता “स्वतःवर आरोप असताना शेतकऱ्यांना उपदेश देणं योग्य आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
कोकाटेंनी संयम राखावा – अजित पवार
अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंशी यासंदर्भात चर्चा केल्याचं सांगितलं आहे. “त्यांनी मला सांगितलं की आता मी मीडियापुढे जास्त बोलणार नाही,” असंही पवारांनी स्पष्ट केलं. मात्र, त्यांनी संयम राखावा आणि आपल्या वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावू नये, याची काळजी घ्यावी, असं पवारांनी सूचवलं.