farmer ID new update राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
राज्य शासनाच्या माध्यमातून ११ एप्रिल २०२५ रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक अंतर्गत तयार करण्यात आलेले ‘फार्मर आयडी’ म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आहे, अशा शेतकऱ्यांनाच कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय १५ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.
मुदतीत नोंदणी न करणाऱ्यांवर परिणाम
यापूर्वी शासनाकडून ३१ जानेवारी, फेब्रुवारी, ३१ मार्च आणि शेवटी १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करण्याबाबत फारशी तत्परता दाखवलेली नव्हती. त्यामुळे शासनाने आता थेट निर्णय घेत सर्व योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य केला आहे.
कृषी योजनांसाठी आधारप्रमाणे फार्मर आयडीची मागणी
ज्या पद्धतीने योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला होता, त्याच धर्तीवर आता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना किंवा इतर कोणत्याही कृषी योजनेचा लाभ घेताना फार्मर आयडी क्रमांक बंधनकारक असणार आहे.
कृषी आयुक्तांना ऑनलाइन प्रणालीत सुधारणा करण्याचे आदेश
या निर्णयामुळे महाडीबीटीसह सर्व संबंधित पोर्टल्सवर आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याचे आदेश कृषी आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच, शेतकरी ओळख क्रमांक, त्याच्या संलग्न माहितीप्रमाणे जमिनीसंबंधी माहिती आणि पीकविवरण या सर्व गोष्टी ‘अॅग्रीस्टॅक’ प्रणालीशी जोडण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
अद्याप नोंदणी न केलेल्यांसाठी विशेष सूचना
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडीसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने संबंधित पोर्टलवर नोंदणी करावी. ग्राम कृषी विकास समिती, सीएससी केंद्रे आणि इतर स्थानिक यंत्रणांच्या मदतीने ही नोंदणी प्रक्रिया राबवण्यात यावी, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत.
प्रचार व जनजागृतीसाठी आयुक्त कृषी यांना जबाबदारी
फार्मर आयडी अनिवार्य झाल्याबाबतची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार व जनजागृतीचे निर्देश कृषी आयुक्तांना देण्यात आले आहेत.
महाडीबीटी पोर्टल अपडेट, अर्ज करताना आयडी अनिवार्य
महाडीबीटी पोर्टल लवकरच अपडेट होणार असून, या पोर्टलवर शेतकऱ्यांना जेव्हा नव्याने अर्ज करावे लागतील, तेव्हा त्या अर्जात फार्मर आयडी क्रमांक भरावा लागणार आहे. त्यामुळे फार्मर आयडी कार्ड कधी मिळेल याची वाट न पाहता, नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.